मुंबई
Vijay Wadettiwar मुंबई महानगरपालिकेतील विकास निधीच्या वाटपावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत निधी वाटपात मोठी तफावत असल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावरून मुंबईतील राजकारण अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी दावा केला की, विकास निधी वाटपात राजकीय भेदभाव केला जात असून ठाकरे गटाच्या नगरसेवकांना अत्यल्प निधी दिला जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी केवळ दोन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, तर शिंदे गटाच्या नगरसेवकांना 20 कोटी, 50 लाख आणि 25 लाख यांसारख्या मोठ्या रकमा वितरित केल्या जात आहेत. या तफावतीवर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
“यालाच समतोल विकास Vijay Wadettiwar म्हणायचे का? महाराष्ट्रात कधीही अशा प्रकारे फक्त आपल्या नगरसेवकांना निधी देण्याची पद्धत नव्हती,” असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. यापूर्वीच्या सरकारांच्या काळात निवडणुकांनंतर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व भागांना समान विकास निधी देण्याची परंपरा होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.सध्या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना निधीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत त्यांनी ही पद्धत लोकशाहीसाठी घातक असल्याचे म्हटले. “विरोधी आहेत म्हणून त्यांच्या मतदारसंघाचा विकासच थांबवायचा का, हे आता जनता ठरवेल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.या आरोपांनंतर मुंबई महानगरपालिकेतील विकास निधी वाटपाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.