जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५१२ लखपती दिदी

*२९७ कोटी ७२ लाखाचे कर्ज महिलांच्या सक्षमीकरणाला स्वयं सहायता समुहाची जोड

    दिनांक :11-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
lakhpati didi वर्धा जिल्ह्यात महिला बचत गटाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या चळवळीला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियान अंतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील महिला सक्षम होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यातील ३ लाख ७७ हजार ८६८ महिलांपैकी २ लाख १९ हजार ८४२ महिला स्वयं सहायता समूहाशी जुळल्या आहेत. जिल्ह्यात १ लाख ४२ हजार ५१२ लखपती दिदी झाल्या आहेत. उर्वरित १० हजार महिला लवकरच लखपती दिदी होतील, असे सांगण्यात आले.
 
 
lakhpati didi
 
 
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभियानांतर्गत महिला स्वयं सहायता समुहांना ३० हजार प्रमाणे फिरता निधी आणि प्रभाग संघांना ६० हजार प्रमाणे समुदाय गुंतवणूक निधी देण्यात येतो. यामध्ये जिल्ह्यातील १४ हजार ३७८ समुहापैकी १४ हजार १०० समुहांना फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच १ हजार ६० समुहांना गुंतवणूक निधी देण्यात आला आहे. केंद्र व राज्य शासनाचे महिलांना सक्षम करण्याचे धोरण आहे. महिलांना आत्मनिर्भय बनविण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून या दिशेने शासन वाटचाल करीत आहे. जिल्ह्यातील स्वयंसहायता असलेल्या १ लाख ५३ हजार ७१ महिलांना लखपती करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मागील वर्षात ७९ हजार ३५७ महिला लखपती झाल्या आहेत तर या वर्षात ६३ हजार ५१२ महिला लखपती झाल्या असून उर्वरीत १० हजार २०२ महिलांना लखपती करण्यात येणार आहे. ७७९ कोटीचे समुहांना कर्जाचे वितरण
बचत गटांना स्वत:चा उद्योग सुरू करण्यासाठी स्वयंसहायता समुहांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मागील वर्षात ११ हजार ६९६ समुहांना ४८२ कोटींचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले असून उद्दिष्टापेक्षा दीडपट जास्त कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.lakhpati didi या वर्षात ८ हजार ८० समुहांना २२० कोटी रुपयाचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट असून आतापर्यंत ६ हजार ९०२ समुहांना २९७ कोटी ७२ लाख रुपयाचे कर्ज देण्यात आले आहे.
व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या १ हजार ६०० उद्दिष्टापैकी १ हजार ४५५ विविध योजनेंतर्गत बँकेकडे सादर करण्यात आले असून त्यापैकी बँकेने ९७८ प्रस्ताव मंजूर केले असून उर्वरीत प्रस्ताव मंजूर होणार आहे.
महिला स्वयंसहायता समुहांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध होत असल्यामुळे कुंटुंबांतील कर्ता पुरुषाच्या बरोबरीने महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहे. या वाटचालीमुळे बचत गटाच्या चळवळीला मोठा हातभार मिळत आहे.