महाराष्ट्राला स्टार्टअपचे अग्रगण्य केंद्र बनवण्यास सरकार कटिबद्ध

    दिनांक :12-Apr-2026
Total Views |
- राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे प्रतिपादन
- 'विकसित भारत स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह'चा समारोप
- नागपूरच्या उत्कर्ष पांडे यांना १ लाखांचा मानाचा पुरस्कार

नागपूर, 
Vikasit Bharat Start-up Conclave महाराष्ट्राला स्टार्टअपचे अग्रगण्य केंद्र बनवण्यास सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण आणि गृह विभागाचे माननीय राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इन्क्युबेशन सेंटर, विदर्भ इकॉनोमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद) आणि ‘लेमन आयडियाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'विकसित भारत स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह'चा समारोपिय कार्यक्रम शनिवार, दिनांक ११ एप्रिल रोजी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.

bharat dksl 
 
गुरुनानक भवन येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. भोयर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात स्टार्टअप संस्कृतीला चालना मिळत असल्याचे सांगितले. नागपूर शहर विकसित दिशेने वेगाने वाटचाल करत असून नवोन्मेष आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रस्थानी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, वेदच्या अध्यक्ष डॉ. रीना सिन्हा, लेमन आयडियाजचे संस्थापक दीपक मिनारिया, उद्योजक श्रीयांश उगेमुगे यांची उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी विद्यापीठाच्या वतीने अव्वल १० स्टार्टअप्सना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली. प्राथमिक शिक्षणापासूनच स्टार्टअप संस्कृती रुजविण्याचे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये नवोन्मेष प्रयोगशाळांची गरज अधोरेखित केली.
Vikasit Bharat Start-up Conclave  पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध श्रेणींतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्युनियर कॅटेगिरीत अमृतसरच्या गुरांश सिंह याने ‘गोल्डन इयर्स’साठी प्रथम क्रमांक पटकावला. इनोव्हेशन ट्रॅकमध्ये ‘इको ईटी टेक्नॉलॉजी’ला प्रथम क्रमांक मिळाला.
टॉप कॅटेगिरीत नागपूरच्या उत्कर्ष पांडे यांनी ‘टेकास फुटवेअर प्रा. लि.’ या स्टार्टअपने १ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळवत विशेष मान मिळवला. या कॉन्क्लेव्हमधून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना मिळत ‘विकसित भारत’च्या दिशेने ठोस पाऊल उचलले जात असल्याचे चित्र स्पष्ट झाले.