मुंबई
Manoj Jarange Patil मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सरकारने यापूर्वी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ते पूर्ण न झाल्याने मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होईपर्यंत ते शांत बसणार नाहीत. “जोपर्यंत सर्व गुन्हे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत मी मागे हटणार नाही. गरज पडल्यास मोठे आंदोलन उभे करून सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू,” असा इशारा त्यांनी दिला. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याचे त्यांनी नमूद करत, त्याबाबत तातडीने अहवाल सादर करून कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली.
मराठा आरक्षण उपसमितीवरही Manoj Jarange Patil त्यांनी तीव्र शब्दांत टीका केली. उपसमितीचे काम केवळ औपचारिक बैठकांपुरते मर्यादित राहू नये, तर मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. समाजातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक आणि आरोग्याशी संबंधित समस्या याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.उपसमितीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला न्याय मिळवून देणे हे समितीचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे. समाजात फूट पडेल अशा प्रकारच्या निर्णयांपासून दूर राहण्याचेही त्यांनी आवाहन केले.या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात असून, राज्य सरकार पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.