कामगार हक्कांसाठी योगी सरकारचे कठोर पाऊल!

औद्योगिक क्षेत्राला २४ तासांत आदेश

    दिनांक :13-Apr-2026
Total Views |
लखनौ,
Yogi's tough stance on labor rights मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कामगारांच्या हक्कांबाबत अधिक कठोर आणि सक्रिय भूमिका घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासनाला स्पष्ट आणि वेळबद्ध निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर कामगार विभागाने राज्यातील सर्व औद्योगिक विकास प्राधिकरणांना तत्काळ हालचाल करण्याचे आदेश दिले आहेत. उद्योग व्यवस्थापन, कारखाना संघटना आणि कामगार यांच्याशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून त्या त्वरित सोडवण्यावर भर देण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी केवळ चोवीस तासांच्या आत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 
labor rights
 
अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा
कामगारांना वेळेवर आणि सन्मानजनक वेतन मिळावे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अतिरिक्त काम केल्यास त्याचे योग्य आणि नियमांनुसार मोबदला देणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक औद्योगिक युनिटमध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण उपलब्ध असावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.कामगारांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्यावरही सरकारने जोर दिला आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, आरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षा साधने प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कामगारांच्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
कामगारांच्या हक्कांबाबत तडजोड नाही
स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने सर्व लहान मोठ्या औद्योगिक युनिट्सशी सतत संपर्क ठेवून समस्या सुरुवातीच्या टप्प्यातच सोडवण्यावर भर देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.मुख्यमंत्र्यांनी औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या असंतोषाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली असून कामगारांच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच कामगार प्रतिनिधींच्या चर्चेत केवळ वास्तविक कामगारांचाच सहभाग असावा, बाहेरील व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे वातावरण बिघडू नये याची दक्षता घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.