शिक्षणानेच समाजपरिवर्तन शय : डॉ. देवरे

*सामाजिक समता सप्ताह साजरा

    दिनांक :15-Apr-2026
Total Views |
बुलढाणा, 
pravin-kumar-deore  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला शिक्षणाचा मूलमंत्र दिला. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी ज्ञानाची साधना केली. आजच्या तरुण पिढीनेही त्यांच्या विचारांचा वारसा चालवत, उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.
 
 
 
k
 
 
सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देवरे बोलत होते. यावेळी आ. संजय गायकवाड, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, सहायक आयुक्त मनोज मेरत, महिला व बाल विकास अधिकारी प्रमोद एंडोले आदी उपस्थित होते.
 
 
डॉ. प्रविणकुमार देवरे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात तळागाळातील समाजात आत्मविश्वास निर्माण करणे हा सर्वात कठीण टप्पा होता, जो महापुरुषांच्या कार्यामुळे साध्य झाला. बाबासाहेबांचे विचार आणि जगातील उपलब्ध ज्ञान आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी. उच्च पदस्थ व्यक्तींनी आणि तरुणांनी सुशिक्षित समाजाकडून जे मिळाले आहे, त्याची परतफेड करण्यासाठी सदैव तत्पर राहावे. नवीन पिढीने तंत्रज्ञान आणि पुस्तकांच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध करावी आणि भारताच्या जडणघडणीत सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. देवरे यांनी आपल्या वैयक्तिक प्रवासाचा दाखला देत सांगितले की, सातपुड्याच्या कुशीतील एका छोट्याशा खेड्यातून येऊन जर प्रगती साधता येते, तर आजच्या सोयी-सुविधांच्या काळात विद्यार्थी नक्कीच मोठे यश संपादन करू शकतात.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांच्या प्रास्ताविकाने झाली. याप्रसंगी शाहीर डी. आर. इंगळे यांनी आपल्या पहाडी आवाजात शाहिरी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन वरिष्ठ लिपिक संदीप कपले आणि सहाय्यक शिक्षिका स्नेहल काळवाघे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि इतर मागास व बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक गीता केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.