विदर्भ, मराठवाड्यात २१ एप्रिलपर्यंत अलर्ट

उष्णतेसोबत वादळी पावसाची शक्यता

    दिनांक :16-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Alert in Vidarbha, Marathwada देशभरातील हवामानात सध्या मोठे बदल जाणवत असून काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांसाठी अंदाज जाहीर केला असून २१ एप्रिलपर्यंत देशातील विविध भागांत वेगवेगळ्या स्वरूपाचे हवामान अनुभवायला मिळणार आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रासह एकूण १३ राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
 
 

alert 
उकाडा तीव्र होणार
पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक या भागांमध्ये १६ ते १९ एप्रिलदरम्यान उष्णतेचा जोर अधिक राहील, तर छत्तीसगड आणि तेलंगणा येथेही याच कालावधीत तापमान वाढेल. पश्चिम मध्य प्रदेश आणि ओडिशा येथे १७ ते १९ एप्रिलदरम्यान उष्णतेची तीव्रता जाणवेल, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात १६ ते १८ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. रायलसीमा भागातही १७ आणि १८ एप्रिल रोजी उष्णतेचा प्रभाव दिसून येईल. याशिवाय गंगा खोऱ्यातील काही भागांमध्ये तसेच किनारपट्टीवरील महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये दमट उष्णतेचा त्रास वाढू शकतो. तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, किनारपट्टीवरील कर्नाटक आणि केरळ या भागांमध्येही उकाडा तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशाच्या वायव्य भागात सक्रिय असलेल्या पश्चिमी वाऱ्यांमुळे आणि नवीन प्रणालीच्या प्रभावामुळे अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
१८ ते २१ एप्रिलदरम्यान पावसाची शक्यता
ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. आसाम आणि मेघालय येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होऊ शकते, तसेच वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथेही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असून अरुणाचल प्रदेशात विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम भारतातही काही भागांमध्ये हवामानात बदल दिसून येणार असून मध्य महाराष्ट्रात १८ ते २१ एप्रिलदरम्यान मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. एकूणच देशभरात उष्णतेची लाट आणि काही ठिकाणी वादळी पावसामुळे बदलते हवामान अनुभवायला मिळणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.