गडचिरोली,
Dr. Devrao Holi भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली. राज्यातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. बैठकीदरम्यान गावागावात पक्षाची संघटनात्मक मजबुती वाढविण्यासाठी विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. प्रत्येक मोर्चाचे पदाधिकारी, पक्षाचे सरचिटणीस तसेच प्रभारी यांनी आपापल्या जबाबदार्या प्रभावीपणे पार पाडाव्यात, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक संवाद साधून पक्षविस्तार करण्याचे उद्दिष्ट यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष Dr. Devrao Holi डॉ. देवराव होळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कार्याचा सविस्तर अहवाल सादर केला. तसेच आगामी काळात राबविण्यात येणार्या विविध संघटनात्मक कार्यक्रमांची माहिती देत आदिवासी समाजापर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी ठोस नियोजन मांडले. या बैठकीस प्रभारी आमदार योगेश सागर, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, महामंत्री डॉ. संजय कुथे, सरचिटणीस माधवी नाईक, सरचिटणीस आमदार निरंजन डावरे, सरचिटणीस राजेश पांडे, किसान आघाडी, युवा मोर्चा, अल्पसंख्यांक आघाडी, विमुक्त भटक्या जमातीचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. एकंदरीत ही बैठक संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून राज्यभरात भाजपा अधिक मजबूत करण्यासाठी स्पष्ट दिशा निश्चित करण्यात आल्याचे दिसून आले.