वर्धा
heatwave alert राज्यात सध्या उन्हाचा पारा झपाट्याने वाढत असून नागरिकांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली असून तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.याच परिस्थितीचा विचार करून वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून गुरुवार, 16 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अंगणवाडीपासून ते प्राथमिक व माध्यमिक शाळांपर्यंत सर्वांचा समावेश आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाचा निर्णय
भारतीय हवामान विभागाने वर्धा जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली असून उष्ण वारेही वाहू लागले आहेत. 16 एप्रिल रोजी तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत अधिकार वापरून हा निर्णय घेतला आहे. सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हा आदेश लागू करण्यात आला आहे.
राज्यातील तापमानाची भीषण स्थिती
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. अकोल्यात 44 अंश, वर्ध्यात 43.5 अंश, तर सोलापूरमध्ये (Solapur) 43.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळ जळगाव, नागपूर (Nagpur) आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही तापमान 42 अंशांच्या आसपास पोहोचले आहे.मालेगाव, सांगली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड आणि सातारा या भागांतही तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उष्णतेचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.