मतदारसंघ पुनर्रचनेला राज ठाकरे यांचा विरोध

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई
Raj Thackeray देशातील आगामी लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आणि जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र विरोधाची भूमिका घेतली असून या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्रातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना केली गेल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल, असा इशारा देत त्यांनी या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
 

Raj Thackeray 
संसदेत सध्या चर्चेत असलेल्या प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रक्रियेत लोकसंख्या हा मुख्य आधार ठरल्यास उत्तर भारतातील राज्यांचे प्रतिनिधित्व वाढण्याची आणि दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व तुलनेने कमी होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू आहे.
राज ठाकरे Raj Thackeray  यांनी याआधीही लोकसंख्या वाढीच्या निकषावर आधारित मतदारसंघ पुनर्रचनेला विरोध दर्शवला असून, लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण यशस्वीपणे राबविणाऱ्या राज्यांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या मते, पुनर्रचना प्रक्रियेत समतोल साधणे आवश्यक असून केवळ संख्यात्मक आधारावर निर्णय घेणे योग्य ठरणार नाही.दरम्यान, केंद्र सरकारकडून या प्रक्रियेत कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, तसेच लोकसभेतील एकूण जागा वाढवून सर्व राज्यांचे प्रतिनिधित्व वाढवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीही विरोधकांकडून या मुद्द्यावर संशय व्यक्त केला जात असून, आगामी काळात संसद आणि राजकीय व्यासपीठांवर यावरून मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय पक्षही सतर्क झाले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांकडूनही या मुद्द्यावर लक्ष ठेवले जात आहे. लोकसंख्या, प्रतिनिधित्व आणि प्रादेशिक समतोल या तीन मुद्द्यांभोवती या संपूर्ण वादाचे केंद्र फिरत असून आगामी निवडणुकांच्या राजकारणावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.