मुंबई
Maharashtra rain alert राज्यातील पावसाचे थांबण्याचे नाव नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असताना, आजही भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा मोठा इशारा जारी केला आहे. हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिट होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पावसाचा जोर काहीसा कमी असला तरीही सतत बदलत असलेले हवामान शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी चिंता वाढवत आहे.
मार्च महिना संपून एप्रिल Maharashtra rain alert
महिन्याला प्रवेश झाला असला तरी, पावसाने राज्यभर थांबण्याची चिन्हे दाखवली नाहीत. या सतत चालणाऱ्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पिक गमावल्याने शेतकऱ्यांकडून भरपाईसाठी मागण्या सुरु आहेत.धाराशिव जिल्ह्यात आज पहाटेच जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला असून धाराशिव, कळंब, वाशी व तुळजापूर तालुक्यांमध्ये द्राक्ष, आंबा, केळीसह ज्वारी व काढणीसाठी आलेले गहूही मोठ्या प्रमाणात खराब झाले आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांत धाराशिव जिल्ह्यात सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सातत्याने वाढत आहे.वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा, रिसोड आणि वाशिम तालुक्यांमध्ये रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे कांदा, गहू, ज्वारी तसेच आंबा बागांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याच्या वेगामुळे पिके आडवी पडण्याचा धोका निर्माण झाला असून, काढणीच्या टप्प्यातील शेतातील पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
हवामानतज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, घराबाहेरची हालचाल मर्यादित करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाचा जोर काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने, राज्यातील नागरिक आणि शेतकरी सतर्क राहतील असे हवामान विभागाने सांगितले आहे.