मुंबई,
Women reservation bill महिला आरक्षण विधेयकावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे. गेल्या आठवड्यात संसदेत महिला आरक्षण विधेयकावरून निर्माण झालेल्या वादानंतर भाजप आणि सत्ताधारी पक्षांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवत त्यांना “महिला आरक्षणाचे विरोधक” असे संबोधले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांवर जोरदार टीका करत काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. फडणवीस यांनी विरोधकांबाबत केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी “ते काल रेटून खोटे बोलत होते” असा थेट आरोप केला. सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दिशाभूल केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
अंधारे यांनी 2023 मध्ये Women reservation bill संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले जात असतानाच्या घटनांचा उल्लेख करत काही नेत्यांची भाषणे आणि ट्विट्सही पत्रकार परिषदेत सादर केली. भाजप आणि केंद्रातील काही नेत्यांनी त्या वेळी विधेयकाचे स्वागत केले होते, तर आज मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे “खरे बोलणारे कोण आणि खोटे बोलणारे कोण,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.इतिहासाचा संदर्भ देत अंधारे यांनी सांगितले की महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच विरोध झाला असून 1951 मध्ये संसदेत अशाच स्वरूपाच्या प्रयत्नांना विरोध झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिल्याचा दावा करत त्यांनी या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आजच्या राजकीय चर्चेशी जोडला.
महिला आरक्षण विधेयकावरून सुरू झालेल्या या वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप पुढील काळातही सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.