सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांकडे डोळेझाक
नागपूर-हैदराबाद मार्गावर अपघातांचा धोका वाढला
पांढरकवडा,
Nagpur-Hyderabad Highway राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर सर्वोच्च न्यायालयाने ‘नो पार्किंग’ व महामार्गालगत अनधिकृत बांधकाम हटवण्याचे स्पष्ट निर्देश असूनही प्रत्यक्षात मात्र या आदेशांची पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. महामार्गालगत उभारण्यात आलेले अनेक व धाबे नियमबाह्य असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे, काही धाब्यांचा वापर अवैध कृत्यांसाठी तसेच गांजा व गोमांस तस्करीसारख्या गैरप्रकारांसाठी होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून वारंवार होत आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महामार्गावर धाब्यांसमोर मोठ्या प्रमाणात ट्रक व इतर वाहने उभी राहतात. वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. परिणामी, वेगाने येणार्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पिंपरी रोड परिसरात दोन पेट्रोल पंपांपुढे परिस्थिती अधिकच गंभीर आहे. येथे अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विरुद्ध दिशेने येणार्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी वाहनांमुळे रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे सुमारे १ किमी परिसर धुळीच्या विळ‘यात सापडला आहे.
या सर्व प्रकारामुळे वारंवार अपघात घडत आहे. काही दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या. नागरिकांनी करंजी महामार्ग पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या. मात्र प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने महामार्गांवरील अनधिकृत धाबे व व्यावसायिक आस्थापनांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तरीही Nagpur-Hyderabad Highway नागपूर-हैदराबाद महामार्गावर या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.