नवी दिल्ली,
Raghav Chadha left AAP आम आदमी पक्षात मोठी राजकीय घडामोड घडत असून पक्षात गंभीर फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी पक्षाला रामराम करत आपल्यासोबत अनेक खासदार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, पक्ष सोडून बाहेर पडलेले काही खासदार आता त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत आणि एकत्रितपणे नवी दिशा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना राघव चड्ढा यांनी पक्षावर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले की, ज्या संघटनेसाठी त्यांनी अनेक वर्षे मेहनत घेतली, तो पक्ष आता आपल्या मूळ विचारसरणीपासून दूर गेला आहे. पक्षाचे कामकाज जनहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाभोवती फिरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यामुळेच आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी त्यांच्यासोबत संदीप पाठक आणि अशोक मित्तल हेही उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, राज्यसभेतील पक्षाचे मोठ्या संख्येने सदस्य संविधानातील तरतुदींचा आधार घेत पुढील राजकीय पाऊल उचलणार आहेत. चड्ढा यांनी दावा केला की, त्यांच्या गटाला आवश्यक त्या प्रमाणात खासदारांचा पाठिंबा मिळाला असून ते एकत्रितपणे पुढील निर्णय घेणार आहेत. या घडामोडींमुळे आम आदमी पक्षात खळबळ उडाली असून पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे देशाच्या राजकारणातही नवे समीकरण तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.