विश्वचषकापूर्वी मोठी कामगिरी! टीम इंडियाची कर्णधार अव्वल स्थानी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
team-india-captain : सध्या पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघासाठी पहिले तीन सामने अत्यंत निराशाजनक ठरले असून, तिन्ही सामन्यांमध्ये त्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, जोहान्सबर्ग येथील वँडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात शानदार ६६ धावा करणाऱ्या टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत १९२ धावा केल्या, तर आफ्रिकन संघाने केवळ एक गडी गमावून १६.३ षटकांतच हे लक्ष्य गाठले.
 
 
IND
 
 
 
महिला कर्णधारांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू हरमनप्रीत कौर ठरली
 
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आता महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनली आहे. यापूर्वी हे स्थान श्रीलंकेच्या महिला कर्णधार चमारी अटापट्टू यांच्या नावावर होते, ज्यांना आता हरमनप्रीत कौरने मागे टाकले आहे. हरमनप्रीत कौरने आतापर्यंत महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून १३८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिला १२५ डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली आहे आणि तिने ३२.७९ च्या सरासरीने एकूण ३०१७ धावा केल्या आहेत. या कालावधीत हरमनप्रीत कौरने एक शतक आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत सध्या दुसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूच्या नावावर ३०१६ धावा आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून ३००० किंवा त्याहून अधिक धावा करणारी हरमनप्रीत कौर आतापर्यंतची केवळ दुसरी खेळाडू ठरली आहे.
 
महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारी खेळाडू
 
हरमनप्रीत कौर (भारत) - ३०१७ धावा
चमारी अटापट्टू (श्रीलंका) - ३०१६ धावा
मेग लॅनिंग (ऑस्ट्रेलिया) - २६१९ धावा
शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) - २५२९ धावा
सुझी बेट्स (न्यूझीलंड) - २२३६ धावा
 
विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी धोक्याची घंटा
 
यावर्षी महिला टी-२० विश्वचषक इंग्लंडमध्ये आयोजित केला जात असून, ही स्पर्धा १२ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे, भारतीय संघाला आपली तयारी पक्की करण्यासाठी फारसा वेळ मिळालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे भारतीय संघासाठी धोक्याची घंटा वाजली आहे.