मऊ,
Scorpio accident; five killed उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. यात एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लग्नसमारंभातून परतत असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. दोहरीघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडला. रांची येथे विवाह समारंभ आटोपून परतणारी स्कॉर्पिओ कार आणि समोरून येणारा ट्रेलर यांच्यात जोरदार धडक झाली. बारासातपूर–अहिरानी महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली आणि समोरून येणाऱ्या वाहनाला थेट धडकली.

धडकेचा जोर इतका प्रचंड होता की स्कॉर्पिओमधील पाचही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासोबत असलेला एक पाळीव कुत्राही ठार झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब रांची येथे मुलीच्या लग्नासाठी गेले होते आणि गोरखपूर जिल्ह्यातील आपल्या गावाकडे परतत होते. मात्र घरी पोहोचण्याआधीच हा भीषण अपघात घडला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शवविच्छेदनासाठी ते जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.