मणिपूरमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मणिपूर,
Three killed in firing in Manipur उखरुल जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या गोळीबाराच्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. या हिंसक घटनांदरम्यान अनेक घरे जाळण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. कुकी आणि नागा या दोन आदिवासी समुदायांमधील सशस्त्र गटांमध्ये झालेल्या संघर्षामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिली घटना मुल्लम गावाजवळ घडली, जिथे सकाळी जोरदार गोळीबार झाला. सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दोन मृतदेह ताब्यात घेतले. मृतांपैकी दोघेही गोळी लागून ठार झाले होते आणि त्यांच्या अंगावर लष्करी गणवेश होता. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून काही घरांना आग लावण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
 
manipur violence
 
याच परिसरात पहाटे सुमारास सशस्त्र गटांमध्ये झालेल्या संघर्षात मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला. या वेळी गावाच्या बाहेरील भागात अनेक घरांना आग लावण्यात आली आणि परिसरात गोंधळ उडाला. या हिंसाचारात काही महिलांसह किमान पाच जण जखमी झाले आहेत. दुसरी घटना सिनाकेइथेई गावाजवळ घडली, जिथे हल्लेखोरांनी एका व्यक्तीवर गोळीबार करून त्याला ठार केले. या हल्ल्यात इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर स्थानिक पातळीवर तणाव वाढला असून सुरक्षा यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. या घटनांवर विविध संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून दोन्ही समुदायांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काही संघटनांनी या हिंसाचारासाठी प्रतिस्पर्धी गटांना जबाबदार धरले आहे, तर दुसऱ्या बाजूने हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. संपूर्ण परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असून सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.