इतिहासाचा खजिना सापडला! २ हजार वर्षांचं ताम्रपत्र उघड

    दिनांक :26-Apr-2026
Total Views |
बिलासपूर,
2000-year-old-copperplate-discovered : बिलासपूर जिल्ह्यातील मल्हार परिसरात तब्बल सुमारे २००० वर्षे जुने आणि जवळपास ३ किलो वजनाचे एक प्राचीन ताम्रपत्र सापडल्याने इतिहास संशोधकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी संजीव पांडेय यांच्या ताब्यात हे ताम्रपत्र आढळून आले असून, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयच्या ‘ज्ञान भारतम्’ मोहिमेदरम्यान हा महत्त्वाचा शोध समोर आला.
 
3-kg-copper-leaf-found
 
 
या मोहिमेचा उद्देश देशभरातील जुनी हस्तलिखिते, दस्तऐवज आणि ऐतिहासिक वस्तू शोधून त्यांचे जतन करणे हा आहे. तज्ज्ञांच्या मते, हे ताम्रपत्र त्या काळातील भूमीदान, राजकीय आदेश किंवा धार्मिक घोषणा नोंदवण्यासाठी वापरले गेले असावे. विशेष म्हणजे, या ताम्रपत्रावर पाली भाषेत मजकूर लिहिलेला असून तो ब्राह्मी लिपीत कोरलेला आहे. ही लिपी आणि भाषा प्राचीन भारतात, विशेषतः मौर्य काळात आणि त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती.
 
अक्षरांची रचना आणि शैली पाहता हे ताम्रपत्र इ.स.पूर्व पहिल्या शतकातील किंवा त्यानंतरच्या काळातील असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या पुरातत्त्व विभाग आणि तज्ज्ञ यावर स्वच्छता व अभ्यास करत असून, त्यावरील प्रत्येक अक्षर वाचून त्याचा अर्थ समजून घेण्याचे काम सुरू आहे. पूर्ण भाषांतर झाल्यानंतर यात कोणत्या राजाचा किंवा शासकाचा उल्लेख आहे, हे स्पष्ट होईल.
 
मल्हार (प्राचीन नाव प्रसन्नपूर) हे पूर्वी एक महत्त्वाचे व्यापारी आणि धार्मिक केंद्र होते. त्यामुळे या ताम्रपत्राचा शोध त्या काळातील सामाजिक रचना, प्रशासन आणि धार्मिक परंपरांबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकतो. हा शोध केवळ ऐतिहासिकच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही खूप मौल्यवान मानला जात आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या ताम्रपत्रांचा अभ्यास केल्यास प्राचीन भारतातील शासनपद्धती, समाजव्यवस्था आणि परंपरांविषयी अनेक नवी माहिती समोर येऊ शकते. त्यामुळे हा शोध छत्तीसगडच्या समृद्ध वारशाला अधोरेखित करणारा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.