कारंजा लाड,
Karanja Lad राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ, कारंजा तालुका कृषी व्यवसायीक संघटनेने २७ एप्रिल पासून बेमुदत कृषी सेवा केंद्रे बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार २७ एप्रिल पासून कारंजा तालुयातील ११० कृषीसेवा केंद्र बंद आहेत.त्यामुळे शेतकर्यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले होते.
संघटनेचे अध्यक्ष विनोद राऊत व सचिव जगदीश बांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्री व्यवसायातील विविध अडचणी गेल्या ४ ते ५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत राज्याचे कृषी मंत्री, प्रधान सचिव, कृषी आयुक्त व कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), पुणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.या पार्श्वभूमीवर राज्यभरातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एकत्र येत २७ एप्रिलपासून बेमुदत बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारंजा तालुयातील सर्व कृषी सेवा केंद्रेही पूर्णपणे बंद आहेत. बंद कालावधीत कोणताही घाऊक किंवा किरकोळ विक्रेता कंपन्यांकडून येणारा कृषी माल स्वीकारणार नाही. याबाबत सर्व संबंधित कंपन्यांना लेखी सूचना देण्यात आल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. हे आंदोलनKaranja Lad पूर्णपणे शांततेत पार पाडण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता संघटना घेणार आहे. दरम्यान, विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे.