मुंबई,
Padma Awards recommendation committee पद्म पुरस्कार २०२७ साठी राज्य सरकारने शिफारस समितीची नव्याने रचना जाहीर केली असून या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी या समितीच्या माध्यमातून राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची नावे केंद्राकडे पाठवली जातात. यंदाच्या समितीचे अध्यक्षपद राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. समितीत हसन मुश्रीफ, दादा भुसे, उदय सामंत, पंकजा मुंडे, आदिती तटकरे आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या यादीतून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे नाव वगळण्यात आल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
परंपरेनुसार पद्म पुरस्कारांच्या शिफारसींमध्ये सांस्कृतिक विभागाचा महत्त्वाचा सहभाग असतो. कारण चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत आणि लोककला अशा क्षेत्रांतील मान्यवरांची माहिती सांस्कृतिक विभागाकडे अधिक सखोलपणे उपलब्ध असते. त्यामुळे अशा समितीत सांस्कृतिक मंत्र्यांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो.मात्र यंदा या पारंपरिक पद्धतीत बदल करण्यात आल्याने अनेक राजकीय निरीक्षकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींच्या मते हा प्रशासकीय निर्णय असू शकतो, तर काहींनी यामागे राजकीय समिकरणे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. समितीच्या रचनेत काही विशिष्ट नेत्यांना अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न दिसतो, अशीही चर्चा सुरू आहे.या समितीत मुंबईतील कोणत्याही मंत्र्याचा समावेश नसल्याची बाबही लक्ष वेधून घेत आहे. मुंबई हे राज्यातील सांस्कृतिक आणि कला क्षेत्राचे प्रमुख केंद्र असल्याने या प्रतिनिधित्वाच्या अभावावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.