पुणे,
Pune News पुरंदर तालुक्यातील बेलसर गावात एका मशरूम उत्पादन युनिटमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. गटार साफसफाईदरम्यान झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कामगाराने कंपनीतील गटाराच्या टाकीची साफसफाई करण्यासाठी आत प्रवेश केला होता. काही वेळाने तो बाहेर न आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी दुसरा कामगार आत उतरला. त्यानंतर तिसऱ्यानेही मदतीसाठी टाकीत प्रवेश केला, मात्र तिघेही परत बाहेर आले नाहीत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि टाकीतील कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांनाही बाहेर काढून तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. Pune News प्राथमिक तपासात टाकीमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकामागोमाग एक कामगार मदतीसाठी उतरल्याने ही दुर्घटना घडल्याचेही समोर आले आहे.
मृत कामगारांची ओळख पिंटू राजेश प्रसाद, व्यास सोहम कुमार आणि गौतम रामसुरन कुशवाहा अशी पटली आहे. तिघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. Pune Newsया घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू असून कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.