आजनसरा,
cm baliraja shet pandan शेतकर्यांचा जीव म्हणजे त्याचा शेतमाल आणि तो बाजारापर्यंत पोहोचवणारा रस्ता. मात्र देवळी विधानसभा मतदारसंघातील निधा टाकळी येथील शेकडो शेतकर्यांसाठी हा रस्ताच शाप ठरला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदन रस्ते योजनेत निधा टाकळी शिवपांदन रस्त्याचा तातडीने समावेश करावा, अशी आर्त हाक येथील बळीराजा देत आहे.
निधा टाकळी शिवारातून जाणारा हा शिवपांदन रस्ता केवळ मातीचा आहे. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य आणि उन्हाळ्यात धुळीचे लोट. परिणामी शेकडो शेतकर्यांना रोज मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. बैलबंडी, ट्रॅटर तर दूरच, दुचाकी देखील या रस्त्यावरून काढणे म्हणजे जीवघेणी कसरत आहे.
शेतात सोनं पिकवतो, पण बाजारात न्यायचं कसं? कापूस, सोयाबीन, तूर हातातोंडाशी आली की आमची खरी परीक्षा सुरू होते. मातीच्या रस्त्याने माल न्यायचा तर अर्धा माल रस्त्यात सांडतो आणि उरलेला मिळेल त्या भावात विकावा लागतो. व्यापारी सांगतो, तुझा मालाचा दर्जा खराब झाला. रस्ताच नसेल तर बळीराजा जगणार कसा? या शिवपांदनवरून निधा टाकळी सह परिसरातील ४ ते ५ गावांतील शेकडो शेतकरी दररोज ये-जा करतात. पण शासनाच्या लेखी हा रस्ता अजूनही पांदनच आहे. हा संपूर्ण परिसर देवळी विधानसभा मतदारसंघात येतो.cm baliraja shet pandan रस्ते योजना ही शेतकर्यांच्या शेतापर्यंत पक्का रस्ता देण्यासाठीच सुरू केली आहे. मग निधा टाकळीचा शिवपांदन रस्ता या योजनेपासून वंचित का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आ. बकाने यांनी निधा टाकळी शिवपांदन रस्त्याला प्राधान्य द्यावे व तात्काळ मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.