गडचिरोली,
Maharashtra Right to Public Services सेवा हक्क दिनानिमित्त मंगळवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचार्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत नागरिकांना पारदर्शक, वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ देण्यात आली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी उपस्थितांना शपथ देत सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकाभिमुख दृष्टीकोन ठेवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी यावेळी सांगितले की, शासनाच्या विविध सेवा निर्धारित कालमर्यादेत पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. सेवांमध्ये कोणताही विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी जबाबदारीने कार्य करावे. प्रामाणिकपणा, निःस्वार्थी वृत्ती आणि संवेदनशीलता या मूल्यांच्या आधारे काम केल्यास नागरिकांचा प्रशासनावर विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांनी नागरिकांच्या सेवांमध्ये पारदर्शकता राखणे, वेळेवर सेवा उपलब्ध करून देणे तसेच लोकसेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.