रत्नागिरी,
commercial-gas-shortage : रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायावर गंभीर परिणाम होत असून अनेक व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने काही ठिकाणी हॉटेल्स बंद ठेवावी लागत आहेत, तर काहींनी पर्यायी उपाय म्हणून चुली किंवा इतर साधनांचा वापर सुरू केला आहे.
पर्यटन हंगाम आणि हापूस आंब्याच्या मोसमाच्या तोंडावर निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे हॉटेल चालक, कामगार आणि पर्यटक यांच्यावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी आवश्यक तेवढे सिलिंडर मिळत नसल्याने व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिस्थितीची दखल घेत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याचा पर्याय तपासण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून गॅस पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून, व्यावसायिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.