- आज सोडत : पालकांचे लक्ष लॉटरीकडे
गोंदिया,
अनेकदा मुद्दतवाढ दिल्यानंतर RTE Admission आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर मंगळवारी पूर्ण झाली आहे. याअंतर्गत जिल्ह्यात १०६९ जागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत तब्बल तीन हजार ४७५ अर्ज संबंधित विभागाकडे प्राप्त झाले आहे. १७ फेब्रुवारीपासून सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया आता आटोपली असून सोमवारी ६ जानेवारी रोजी या अर्जांवर सोडत काढली जाणार आहे. तेव्हा आता लॉटरीकडे पालकांच्या नजरा लागल्या आहे.
आटीईद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून संबंधित शाळांना प्रतिपूर्ती स्वरूपात दिले जाते. गरिबांना आपल्या मुलांना शिकविण्यासाठी मोठा आधार ठरत असल्याने दरवर्षी या प्रवेश प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळतो. त्यानुसार यंदा १७ फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र, अर्ज दाखल करण्यास प्रतिसाद कमी असल्याने शिक्षण मंडळाकडून आरटीई प्रवेश प्रकियेला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. तर मंगळवारी शेवटची मुदत देत प्रवेश प्रक्रिया गुंडाळण्यात आली. जिल्ह्यात १०६९ जागांसाठी तब्बल ३ हजार ४७५ अर्ज दाखल करण्यात आले. दरम्यान, शिक्षण संचालनालयाकडून सोमवारी सोडत काढली जाणार आहे. तर तसे पत्रही संबंधित विभागाला प्राप्त झाले आहे. सकाळी ११ वाजता पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे सोडत काढली जाणार असून, त्याची लिंकही विभागाला पाठविण्यात आली आहे.
समग्रचे आंदोलन सुरुच ...
RTE Admission समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत कर्मचार्यांना सेवेत कायम करा, या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्या वतीने ९ मार्चपासून मुंबई येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात येथील कर्मचारीही सहभागी झाले होते. त्यामुळे समग्र शिक्षाचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मात्र, कर्मचारी बुधवारी कामावर परतले व विभागाची संपूर्ण कामे आटोपून दिली. असे असले तरी जिल्ह्यातील ७८ कर्मचारी सोमवारपासून परत मुंबई येथील आंदोलनात सहभागी होणार असून आज, रविवारी मुंबईसाठी रवानाही झाले आहे.