वर्धा,
Speed up the trial of the fake Kharat भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरुद्धचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास व त्याला मदत करणार्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी सोमवार ६ रोजी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने स्थानिक बजाज चौकात धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. भोंदू अशोक खरात याच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यास व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशोक खरातला सहकार्य करणार्यांनाही आरोपी करावे, या विकृत बाबाकडून करण्यात आलेल्या शोषणात सहभागी विधानसभेचे जे ३९ आमदार सहभागी आहेत त्यांची नावे उघड करण्यात यावी, संबंधित आमदार व मंत्र्यांचे तातडीने राजीनामे घेण्यात यावे, खरातच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे समाजमाध्यमांवर व्हिडीओ फिरत आहे ते तातडीने हटविण्यात यावे, राज्यात विकृत बुवाबाजांचे उदंड पीक आले आहे.
प्रत्येक पोलिस स्टेशनला अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करून ते क्रियाशील करण्याचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. आंदोलनाचे नेतृत्त्व यशवंत झाडे, दुर्गा काकडे, ममता खडतकर, कांता प्रधान, कांचन हिंगे यांनी केले. आंदोलनात प्रतीभा कातनकुळे, वैशाली पांडे, जयश्री कंगाले, छाया द्रव्यकार, निर्मला वाघ, बेबी मन्ने, रमा चाटे, बेबी खेडतवार, आरती पवार, आशा इखार, वैशाली मुंजेवार आदी सहभागी झाल्या होत्या.
गॅस सिलिंडर टंचाईचाही रेटला मुद्दा
इराण-इस्त्राईल-अमेरिका यांच्यातील युद्धाचे विपरित परिणाम जिल्ह्यातही दिसून येत आहे. सध्या नागरिकांना गॅस सिलिंडरच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.