'बारामतीसाठी धीर, दादांसाठी श्रद्धांजली'; सुनेत्रा पवार यांची भावनिक घोषणा

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
बारामती,
sunetra-pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी बारामतीकरांसमोर भावनिक आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “बारामतीकरांच्या विकासासाठी आणि अजित दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःखही तळघरात कोंडले आणि अत्यंत धिराने आपल्यासाठी बाहेर पडले. तुम्हा बारामतीकरांच्या प्रेमाने, पाठिंब्याने आणि साथिनेच मला ही शक्ती मिळाली आहे.”
 
 
pawar
 
 
सुनेत्रा पवार म्हणाल्या की गेल्या ३५-३६ वर्षांत बारामतीकरांनी अजित पवारांना प्रचंड मतांनी निवडून दिले आहे, आणि दादांसाठी प्रत्येक बारामतीकर स्वतः उमेदवार असल्याचा भाव घेऊन त्यांनी निवडणूक हाती घेतली आहे. “दादांनी प्रत्येक वेळी आपलेच विक्रम मोडीत काढले. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची खरी संधी आहे,” असेही त्यांनी नम्रतेने सांगितले.
 
भावनिकतेने भरलेल्या या कार्यक्रमात सुनेत्रा पवार म्हणाल्या, “अवघ्या दोन महिन्यांपूर्वी आपण अजित दादांना गमावले. दादा आपल्यात नाहीत, असे अजूनही वाटत नाही. नियतीने मला आणि आपल्यावर ही वेळ आणली आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी आणि माझ्या कुटुंबाची हानी नाही, तर बारामती, राज्य आणि देशाची हानी आहे. बारामती हा दादांचा श्वास होता आणि त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला.”
 
सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना विकास आणि प्रगतीचे आश्वासन दिले. त्यांनी सांगितले, “बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. पवार साहेबांनी बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला आणि अजित दादांनी त्यात रंग भरले. बारामतीला जगातील सर्वात प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते, तर ध्यास होता. त्यांचा विकासाचा विचार मी पुढे नेण्याचा निर्धार केला आहे. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही, हे मी तुम्हाला वचन देते.”
 
या भाषणाने बारामतीकरांमध्ये एकत्रित भावनिक उत्साह निर्माण केला असून, पोटनिवडणुकीच्या मैदानात सुनेत्रा पवार यांचा निर्धार आणि दादांसाठी श्रद्धांजली हे मुख्य आकर्षण ठरले आहे.