अर्जुनी मोरगाव,
wild-elephants-attack-farmers : गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव/बंध्या परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला असून परिसरातील मकापिकासह अन्य पिकाचे नुकसान केले आहे. त्यातच आज, मंगळवारी ७ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या शेतकर्यांवर या रानटी हत्तींनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात शेतकरी थोडक्यात बचावले असले तरी तीन शेतकरी जखमी झाले आहे. दयाराम घुगुसकर, आसाराम निमकर, उज्वल चिंचेकर सर्व रा. वडेगाव/बंध्या असे जखमी शेतकर्यांची नावे आहे. त्यांना केशोरी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात भर्ती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

वडेगाव येथील शेतकरी मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे शेतात गेले होते. शेतशिवारात हत्तींचा कळप असल्याची त्यांना कसलीच कल्पना नव्हती. दरम्यान, शेतात काम करीत असताना अचानक हत्तींचा कळप शेतकर्यावर धावुन आला आणि शेतकर्यांना पाठीमागुन धक्का दिला. ज्यामध्ये सदर तिन्ही शेतकरी जखमी झाले. यावेळी जखमी अवस्थेतच या शेतकर्यांनी पळ काढला व आपले प्राण वाचवले. घटनेची माहिती त्यांनी गावात दिली. तिन्ही जखमी शेतकर्यांना केशोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या हत्तींच्या कळपाने जर आपला मोर्चा गावांकडे वळविला तर मोठा अनर्थ घडण्याची भिती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली असून या रानटी हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. दरम्यान, हत्तीच्या कळपावर लक्ष्य ठेवले जात असून शेतकर्यांनी शेतात जातांना सावधानी बाळगावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.