डॉ. संदीप लोंढे
आजनसरा,
Mangoes: Calcium carbide आंबा फळांचा राजा आणि सर्वांच्या आवडीचा. वर्धा जिल्ह्यात आता आंबराई तशी नावालाच राहिली आहे. बाहेरच्या आंब्यांच्या रसावरच ताव मारावा लागत आहे. त्यातही रत्नागिरीसह कोकणातील आंब्यांनी शहरांमध्ये कहर केला असला तरी गावात अजूनही त्याच परंपरागत आंब्यांची मागणी आहे. कोणतेही फळ पिकल्या शिवाय खाण्यात मजा नाही. त्यामुळे फळं लवकर पिकवत लवकर पैसा खिश्यात कसा येईल या लालसेने कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून अवघ्या ५ तासात आंबे पिकवल्या जात आहेत. बाजारात असलेले बहुतांश आंबे आता कॅल्शियम कार्बाइडने पिकवले असुन ते आरोग्याकरिता घातक ठरत आहे.
Mangoes: Calcium carbide उन्हाळ्यात सर्वांच्याच आवडीचा रसाळ आंबा आता आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. बाजारात वाढती मागणी आणि जास्त भाव मिळवण्यासाठी काही व्यापारी फत ५ तासांत आंबे पिकवण्याची शक्कल लढवत आहे. त्यासाठी कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन स्प्रे सारख्या घातक रसायनांचा अवैध वापर केला जात आहे. नैसर्गिकरित्या झाडावर किंवा अढीमध्ये आंबा पिकायला ५ ते ७ दिवस लागतात. मात्र, व्यापारी आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइडच्या पुड्या ठेवतात. त्यातून निघणारा अॅसिटिलीन वायू आंब्याला पिवळा करतो. काही ठिकाणी कच्च्या आंब्यावर थेट इथिलीन स्प्रे फवारला जातो. अन्न सुरक्षा मानकांनुसार कॅल्शियम कार्बाइड पूर्णपणे प्रतिबंधित आहे. हे रसायन गॅस वेल्डिंगसाठी वापरले जाते. रसायनांनी पिकवलेला आंबा खाल्ल्याने जळजळ, उलट्या, अतिसार आणि पोटात तीव्र कळा येऊ शकतात. दीर्घकाळ सेवन केल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊन स्मरणशक्ती कमी होणे व कर्करोगाचा धोका संभवतो. आंबा बाहेरून अतिशय आकर्षक पिवळा दिसतो त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. ज्या व्यापार्यांकडे असे आंबे सापडतील त्यांचा परवाना तात्काळ रद्द करुन फौजदारी गुन्हे दाखल केले जावे, आंबा खरेदी करताना नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा ओळखा. जास्त चमकदार, एकसारखा पिवळा रंग असलेले आणि वास नसलेले आंबे खाणे टाळावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.