वाशीम,
Historic victory of environmental protection मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण आदेश देत राष्ट्रीय महामार्ग १६१ वरील १०९ झाडांच्या तोडीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती रजनिश व्यास यांनी दिलेल्या आदेशानुसार १० जून २६ पर्यंत संबंधित झाडे तोडण्यास मनाई करण्यात आली आहे. ही जनहित याचिका पर्यावरण संरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते सागर शंकर कोकास यांनी दाखल केली होती. उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, मार्च २६ मध्ये झाडतोडीची अधिसूचना जारी झाली असली तरी अद्याप झाडे तोडण्यात आलेली नसल्याने पुढील सुनावणीपर्यंत संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच या आदेशात १० जून पर्यंत १०९ झाडांची तोड थांबविण्यात आली आहे. याचिकाकर्त्यास उर्वरित प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले असून, पर्यावरणीय मुद्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. या लढ्यासाठी वाशीम येथील अॅड. मोहन गवई यांनी न्यायालयामध्ये कायदेशीर बाजू मांडत पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सागर कोकास यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि निसर्गप्रेमी भूमिकेमुळे हा मोठा विजय शक्य झाला.

हा विजय केवळ १०९ झाडांचा नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांच्या सुरक्षित पर्यावरणाचा विजय आहे. विकासाच्या नावाखाली बेकायदेशीर झाडतोड सहन केली जाणार नाही. हा निर्णय पर्यावरण संरक्षणासाठी जनआंदोलन, न्यायव्यवस्था आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रभावी उदाहरण आहे.
सागर कोकास
सामाजिक कार्यकर्ते वाशीम