नवी दिल्ली,
Trial by Fire at the End of May मे महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दिलेला गारवा आता संपला असून, उर्वरित १५ दिवस देशाला भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. स्कायमेटच्या मते, हवामान प्रणालीमध्ये मोठे बदल झाले असून पाकिस्तानमधील बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. विशेषतः राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात तापमान ४७ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, पंजाबच्या आसपास निर्माण झालेला चक्रीवादळी प्रवाह आता उत्तर प्रदेशच्या दिशेने सरकला आहे. मात्र, आर्द्रता कमी झाल्यामुळे ही प्रणाली कमकुवत झाली आहे. थार वाळवंटातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांनी आता जोर धरला असून, पश्चिमी वाऱ्यांमधील ओलावाही कमी होत आहे. यामुळे उत्तर आणि मध्य भारतात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली थांबणार असून कोरड्या हवामानामुळे तापमानात मोठी वाढ नोंदवली जाईल. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्येही हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून उन्हाचा चटका वाढणार आहे.
एकीकडे मध्य आणि पश्चिम भारत उष्णतेने होरपळणार असताना, दुसरीकडे हिमालयीन पट्ट्यात आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर कायम राहणार आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि लडाखमध्ये पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे सिक्कीम, भूतान, पश्चिम बंगाल आणि आसामच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. दक्षिण भारतातही केरळ, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रासह देशाच्या उर्वरित भागात कोरड्या वाऱ्यांमुळे नागरिकांना घामाघूम करणाऱ्या उष्णतेचा सामना करावा लागणार आहे.