जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समिती सभा
वाशीम,
Jalyukt Shivar Abhiyan एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत.भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जलसंधारण, मृदसंधारण तसेच जलयुक्त शिवार २.० अभियानातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजित वायकोस,जिल्हा जलसंधारण अधिकारी श्याम फेरवाणी, लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता रजत बिजवे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूषण कडू, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंय वानखेडे आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकार्यांनी यावेळी घेतला.
एल निनोच्या परिस्थितीमुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शयता लक्षात घेऊन भूजल पातळी वाढविण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेल्या कामांचे योग्य प्राधान्यक्रम निश्चित करून ती नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच जलयुक्त शिवार अभियानात समाविष्ट गावांमध्ये आवश्यक दुरुस्तीची कामे निकडीनुसार आराखड्यात समाविष्ट करून ती तातडीने पूर्ण करावीत. सुधारित आराखडे सादर करून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
Jalyukt Shivar Abhiyan विशेष निधी व विविध विभागांच्या अभिसरणातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना प्रगतीपथावरील कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना देण्यात आल्या. मृद व जलसंधारण कामांची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी करण्याचे निर्देशही यावेळी देवून जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता राखण्यासोबतच त्याचा दीर्घकालीन परिणाम दिसून यावा, यासाठी अधिक दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार उपक्रमांतर्गत जलसाठ्यांमधील गाळ काढण्याची कामे सुरू असून त्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्यास मदत होईल असे बैठकीत नमूद करण्यात आले. नियोजित कालावधीत गाळ काढण्याची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे. जलयुक्त शिवार २.० योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असून जलसंधारणाच्या कामांमध्ये पारदर्शकता आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर देवून येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची सर्व कामे वेळेत पूर्ण करून अधिकाधिक पाणी साठवणूक होईल, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही प्रतिपादन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केले. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.