भोपाळ,
Death Zones for Tigers देशात सर्वाधिक वाघसंख्या असलेल्या मध्य प्रदेशात गेल्या काही महिन्यांत वाघांच्या वाढत्या मृत्यूंमुळे वन विभाग आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. गेल्या पाच महिन्यांत राज्यात तब्बल ३२ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनांमुळे वन्यजीव संरक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, यामध्ये कान्हा व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीचा आणि तिच्या चार बछड्यांचाही समावेश आहे. वन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी झालेल्या बहुतेक मृत्यूंची नोंद अभयारण्यांच्या बाहेर झाली आहे. वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या अधिवासाचा विस्तार त्याच प्रमाणात न झाल्याने अनेक वाघ जंगलांच्या सीमाबाहेर येत आहेत. परिणामी, मानवी वस्त्या, शेती आणि रस्त्यांच्या परिसरात त्यांचा वावर वाढत असून त्यातून अनेक अपघात आणि संघर्षाच्या घटना घडत आहेत.
विजेच्या तारांमुळे वाघांचा मृत्यू वाढला
२०२२ च्या व्याघ्र गणनेनुसार, देशातील एकूण ३,६८२ वाघांपैकी ७८५ वाघ मध्य प्रदेशात आहेत. २०१८ ते २०२२ या कालावधीत राज्यातील वाघसंख्या जवळपास ४९ टक्क्यांनी वाढली, जी राष्ट्रीय वाढीच्या दरापेक्षा खूप जास्त आहे. मात्र, वाढत्या संख्येनुसार जंगल आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध न झाल्याने वाघांवरील दबाव वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वाघ हे अत्यंत प्रादेशिक प्राणी असल्याने त्यांच्यात अनेकदा क्षेत्रासाठी संघर्ष होतो. अशा संघर्षांमध्ये अशक्त, तरुण किंवा वृद्ध वाघांना नवीन क्षेत्राच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागते. या प्रवासादरम्यान त्यांना मानवी वस्त्यांशी थेट सामना करावा लागतो. वन विभागाच्या मते, शेतांमध्ये रानडुक्कर आणि नीलगाय यांसारख्या प्राण्यांना रोखण्यासाठी लावलेल्या बेकायदेशीर विजेच्या तारांमुळे वाघांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या विद्युत सापळ्यांमुळे अनेक वाघांचा दुर्दैवी अंत होत असल्याचे समोर आले आहे.
बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई आवश्यक
याशिवाय, कॅनाइन डिस्टेंपर नावाच्या विषाणूमुळेही वन विभागाची चिंता वाढली आहे. भटक्या कुत्र्यांमार्फत पसरणारा हा विषाणू वाघांसाठी प्राणघातक ठरत असून, कान्हासारख्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये त्याचा परिणाम दिसून आला आहे. मानव-वन्यजीव संघर्ष, जंगलतोड, वाढते अतिक्रमण आणि सुरक्षित अधिवासाची कमतरता ही वाघांसमोरील प्रमुख आव्हाने बनली आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, यावर्षी नोंदवलेल्या सुमारे ८० टक्के मृत्यूंची ठिकाणे अभयारण्यांच्या बाहेर होती, तर अनेक मृतदेह राखीव जंगलांपासून दूर आढळून आले. वाघसंख्या वाढणे हे वन्यजीव संवर्धनासाठी सकारात्मक असले, तरी त्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिवास विस्तार, मानवी हस्तक्षेपावर नियंत्रण आणि बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करणे आता अत्यावश्यक बनले आहे.