तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
htbt-cotton-seeds : शेतकरी संघटनेने आपल्या अभिनव आंदोलन अंतर्गत दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत यांना एकरी 15 क्विंटल उत्पादन देणारे संकरित एचटीबीटी कापूस बियाणे क्षेत्रीय चाचणीसाठी भेट दिले. यावेळी संघटना नेते दीपक आनंदवार, विजय निवल, अक्षय महाजन, शिवाजी शिंदे व मिलिंद दामले यांनी दिग्रस तहसील कार्यालय प्रांगणात सर्वांना संबोधित केले.
शेतकरी संघटनेचे विज्ञान व तंत्रज्ञान आघाडी प्रमुख मिलिंद दामले यावेळी म्हणाले, आज शेतकरी संघटनेने दिग्रसच्या तहसीलदारांना क्षेत्रीय चाचणीसाठी एचटीबीटी कापूस बियाणे व निवेदन दिले आहे. कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवतो, तसेच एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञान सर्वत्र पोहचत आहे.
शेतकèयांच्या चरितार्थाचे साधन एचटीबीटी कापूस उत्पादन आहे. जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केल्यास शेतकरी जिल्हाधिकारी, तहसील, कृषी कार्यालये आणि विश्रामगृहांत मुक्कामी राहतील आणि त्यांची अन्न व दवा-पाणी सोय शासनाला करावी लागेल, असेही ते म्हणाले.
गेल्या 20 वर्षांत जनुकीय अभियांत्रिकी मूल्यांकन समितीने महिकोच्या फक्त 2 वाणांना क्षेत्रीय चाचणीसाठी अनुमती दिली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व कृषी विद्यापीठांनी कापूस बियाणे तंत्रज्ञान संशोधन केले नाही. खाजगी कापूस बियाणे उत्पादकांच्या संशोधनाला ते बेकायदेशीर ठरवतात. गेले 15 वर्षे एचटीबीटी कापूस बियाण्याला बेकायदेशीर ठरवून केंद्र व राज्य सरकार यंत्रणा हप्ता वसुली करते आहे, असेही दामले यावेळी म्हणाले.
एचटीबीटी कापूस उत्पादक शेतकèयांनी तुपटाकळी, चिंचपात्र, लाख, बेलोरा, आरंभी, रामनगर, दिग्रस, सावंगा (बु), मांडवा, बेलोरा व वसंतनगर येथे गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीवर मात करीत एचटीबीटी कापसाचे एकरी 12 ते 17 क्विंटल उत्पादन घेतल्याने कापूस उत्पादन क्रांती झाली असल्याचा दावा मिलिंद दामले यांनी यावेळी केला.
यवतमाळ जिल्ह्याच्या विविध गावांमधील देवेंद्र राऊत, राजेंद्र झोटिंग, अक्षय महाजन, कृष्णराव भोंगाडे, गिरीश तुर्के, शिवाजी शिंदे, अविनाश पोळकर, इंदल राठोड, मनीष जाधव, पंडित भेंडेकर, चंद्रशेखर देशमुख, शंकर राठोड, विनोद जाधव यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते.