नवी दिल्ली,
Do not go out of the house at night देशाच्या दक्षिण भागात आणि अंदमान किनारपट्टीवर मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असताना, उत्तर भारतात मात्र हवामानात मोठा बदल दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली-एनसीआर, राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान निरीक्षकांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या दिशेने तयार झालेल्या मोठ्या थंडरस्टॉर्म क्लस्टर्समुळे हे ढग पूर्वेकडे सरकत असून त्याचा परिणाम भारतातील अनेक राज्यांवर होऊ शकतो. संध्याकाळपासून रात्रीपर्यंत या प्रणालीचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 80 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो, ज्यामुळे झाडे उन्मळून पडणे, पत्रे उडणे आणि दृश्यमानता कमी होणे अशा घटना घडू शकतात. कच्च्या घरांचे नुकसान होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहनचालकांनी विशेष काळजी घेण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या हवामान प्रणालीमुळे फक्त वारे आणि धुळीचे वादळच नव्हे, तर विजा कोसळण्याची आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस व गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढू शकतो.हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात यंदा प्रचंड उष्णता आणि कोरड्या वाऱ्यांमुळे वातावरण अस्थिर झाले असून पश्चिमी झंझावाताशी झालेल्या टक्करमुळे ही वादळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे.या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने सर्व संबंधित राज्यांतील प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.