गडकरींनी पूर्ण केली आईची इच्छा; विठ्ठलाच्या भक्तांसाठी मोठी भेट!

    दिनांक :15-May-2026
Total Views |
सोलापूर,
nitin-gadkari : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाची वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पालखी महामार्गाच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला असून, वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन या भागात रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी या महामार्गावर एक स्वतंत्र मार्गिका (लेन) तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे ऊन-पावसात चालणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे.
 
 
 
GADKARI
 
 
गुरुवारी पार पडलेल्या या पाहणी दौऱ्यात नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी आपल्या आईच्या एका जुन्या इच्छेची आठवण सांगताना भावूक भावना व्यक्त केल्या. काही वर्षांपूर्वी या भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे पाहून त्यांच्या आईने त्यांना हे रस्ते सुधारण्याची विनंती केली होती. आईच्या त्या इच्छेमुळे आणि विठ्ठलाच्या आशीर्वादानेच आज या पवित्र मार्गाची सेवा करण्याची संधी मिळाली असल्याचे गडकरींनी कृतज्ञतेने नमूद केले.
 
महामार्गाच्या प्रगतीबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाखरी ते पंढरपूर या टप्प्यात रेल्वे प्रशासनाच्या परवानगीमुळे काही तांत्रिक अडथळे येत आहेत, मात्र त्यावर लवकरच तोडगा काढून तो मार्गही वारकऱ्यांसाठी खुला केला जाईल. या महामार्गामुळे केवळ वारकऱ्यांची सोय होणार नाही, तर अक्कलकोट आणि तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा प्रवासही वेगवान आणि सुखाचा होणार आहे.