मॉस्को,
Russia Becomes a Crisis Solver for India पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन बाजारपेठेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असताना, भारतासाठी रशियाकडून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाढत्या संकटामुळे अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच, रशियाने भारताच्या इंधन पुरवठ्यावर कोणताही परिणाम होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी भारताशी असलेल्या ऊर्जा सहकार्याबाबत ठाम भूमिका मांडताना सांगितले की, भारताच्या हितांचे संरक्षण करणे ही रशियाची प्राथमिकता राहील. ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित कोणत्याही करारावर बाह्य दबाव किंवा अनुचित स्पर्धेचा परिणाम होऊ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढणारा
लावरोव्ह यांनी भारत-रशिया संबंधांचा उल्लेख करताना सांगितले की, दोन्ही देशांतील सामरिक भागीदारी केवळ संरक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नसून ऊर्जा सुरक्षेतही ती अधिक मजबूत होत आहे. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा लक्षात घेता रशिया सातत्याने तेल, गॅस आणि कोळशाचा पुरवठा करत असून भविष्यातही हा पुरवठा अखंडित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना होर्मुझ सामुद्रधुनीवरील संकटाचा परिणाम जागतिक तेल वाहतुकीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाची वाहतूक या मार्गाने होत असल्याने परिस्थिती आणखी चिघळल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. अशा वेळी भारतासाठी रशियाने दिलेले आश्वासन महत्त्वाचे मानले जात आहे. भारत आपल्या इंधन गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असल्याने पुरवठा साखळी स्थिर राहणे अत्यंत आवश्यक आहे. रशियाकडून मिळालेल्या या विश्वासामुळे केंद्र सरकारसह उद्योग आणि बाजारपेठेलाही मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे देशांतर्गत इंधन दरांवरील दबाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.