वाढत्या तणावामुळे ‘नो प्रमोशन’चा ट्रेंड जोरात!

डिजिटल युगात कामाचे स्वरूप बदलले

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
The No Promotion Trend एक काळ असा होता जेव्हा पदोन्नती मिळणे हे करिअरमधील सर्वात मोठे यश मानले जायचे. अधिक जबाबदाऱ्या, चांगला पगार आणि सामाजिक प्रतिष्ठा यामुळे बढती मिळाल्यावर कर्मचारी आनंद साजरा करायचे. मात्र आजच्या डिजिटल युगात परिस्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. काम आता फक्त कार्यालयापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर ते घरांपर्यंत आणि वैयक्तिक आयुष्यापर्यंत पोहोचले आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये तणाव, चिडचिड आणि मानसिक थकवा वाढत आहे. गॅलपच्या ‘स्टेट ऑफ द ग्लोबल वर्कप्लेस 2026’ अहवालानुसार जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरीतील असमाधान आणि बर्नआउट लक्षणीयरीत्या वाढत आहे. 2025 पर्यंत कर्मचारी सहभाग केवळ 20 टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, ही गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी पातळी मानली जात आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
 
 
The No Promotion Trend
 
मानसिक शांततेला प्राधान्य
पूर्वी पदोन्नतीला प्रगती आणि आदराचे प्रतीक मानले जात होते, मात्र आता अनेक कर्मचारी तिला वाढलेला कामाचा भार, सततचा डिजिटल दबाव आणि वैयक्तिक आयुष्यातील असंतुलनाशी जोडत आहेत. त्यामुळे नेतृत्वाची पदे स्वीकारण्यापेक्षा अनेकजण त्यापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. काही जण तर जाणूनबुजून बढती नाकारत आहेत, कारण त्यांना वाढत्या जबाबदाऱ्या आणि तणावापेक्षा मानसिक शांतता अधिक महत्त्वाची वाटते.
 
 
चुकीच्या पदांवर नेमणूक परिणाम करणारी
ही समस्या केवळ पदोन्नतीपुरती मर्यादित नाही तर कामाच्या संस्कृतीतील मोठ्या बदलाशी संबंधित आहे. जर पदोन्नती योग्य पद्धतीने आणि गुणवत्तेच्या आधारावर दिली गेली, तर ती प्रेरणा आणि उत्पादकता वाढवू शकते, असे अभ्यासातून समोर आले आहे. मात्र वशिलेबाजी, चुकीच्या पदांवर नेमणूक आणि वाढता दबाव यामुळे कर्मचारी निरुत्साहित होतात आणि एकूण कामगिरीवर परिणाम होतो.कोविडनंतर काम आणि वैयक्तिक आयुष्याबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. आता अनेक कर्मचारी उच्च पदापेक्षा लवचिकता, स्वातंत्र्य आणि वर्क-लाईफ बॅलन्सला अधिक महत्त्व देत आहेत. डिजिटल युगात सतत ऑनलाइन राहणे, रात्री उशिरापर्यंत काम करणे आणि वैयक्तिक आयुष्य व काम यातील सीमारेषा धूसर होणे यामुळे नेतृत्व पदे अधिक तणावपूर्ण झाली आहेत.