नवी दिल्ली,
indias celebration in netherlands पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर असून संयुक्त अरब अमिरातीनंतर ते नेदरलँड्समधील हेग येथे दाखल झाले. येथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना त्यांनी भावनिक आणि उत्साहपूर्ण भाषण करत प्रवासी भारतीयांचे योगदान, संस्कृती आणि भारताशी असलेले नाते यावर भर दिला.
हेगमधील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतीय समुदायाच्या प्रेम आणि उत्साहामुळे काही क्षणांसाठी मला मी नेदरलँड्समध्ये आहे हेच विसरून गेल्यासारखे वाटले. त्यांनी सांगितले की, “जणू काही भारतातच उत्सव सुरू आहे असे वाटत होते,” असे वातावरण येथे अनुभवायला मिळाले.
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की, नेदरलँड्समधील भारतीय समुदायाने डच समाज आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. त्यांनी डच सरकार आणि नागरिकांचेही भारतीय समुदायाला दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
मोदी यांनी प्रवासी भारतीयांच्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, समुद्र पार करून गेलेल्या भारतीयांनी आपली संस्कृती आणि ओळख जपली आहे. अनेक पिढ्या बदलल्या, देश बदलले, तरीही भारतीय परंपरा, कौटुंबिक मूल्ये आणि आपलेपणाची भावना कायम राहिली आहे. त्यांनी याचे श्रेय भारतीयांनी आपली मातृभाषा आणि पूर्वजांची भाषा जपून ठेवल्याला दिले.
ते म्हणाले की, येथे स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबांच्या कथा केवळ स्थलांतराच्या नसून संघर्षातून यश मिळवण्याच्या आहेत. भारतीय संस्कृती आजही जगभरातील लोकांच्या हृदयात जिवंत आहे, हे त्यांनी अभिमानाने अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान त्यांनी 16 मे या दिवसाचा उल्लेख करत सांगितले की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल याच दिवशी जाहीर झाले होते, ज्यामुळे भारतात स्थिर आणि पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन झाले. त्यांनी सांगितले की, लोकांच्या विश्वासामुळेच त्यांना सातत्याने सेवा करण्याची संधी मिळत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री म्हणून 13 वर्षे आणि पंतप्रधान म्हणून 12 वर्षे सेवा करताना लोकांचा विश्वास हीच त्यांची सर्वात मोठी ताकद राहिली आहे.indias celebration in netherlands त्यांच्या मते, जनतेचे आशीर्वाद हीच त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे.
शेवटी त्यांनी भारताच्या वाढत्या आकांक्षांचा उल्लेख करत सांगितले की, आज भारत मोठी स्वप्ने पाहत आहे. देश केवळ बदल नाही तर सर्वोत्तम आणि सर्वात वेगवान प्रगती साधण्याच्या दिशेने पुढे जात आहे. भारताच्या आकांक्षा जितक्या वाढत आहेत, तितकाच देशाचा विकासही अधिक वेगाने होत आहे.