विजय आडे,
उमरखेड,
scorching-heat : शहर व तालुक्यात एप्रिल महिन्यापासूनच उन्हाचा पारा चढला आहे. लोकांची तगमग वाढली आहे. एप्रिल व मे महिन्यात तर उष्णतेने कळसच गाठल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्म्याने जीव कासावीस झाला असतानाच सर्दी, तापाचे रुग्णही वाढत आहेत.
मार्च, एप्रिल, मे महिन्यात तापमानात वाढ होते. मात्र यंदा फेब्रुवारीतच उष्णता कमालीची वाढली होती. मार्च महिन्यातही उष्म्याने चैत्र, वैशाख वणव्याची आठवण करून दिली होती. मार्च अखेरीस अवकाळी पावसाने प्रथम हजेरी लावली होती.
किमान तापमान आता 25 अंशावर आले असून कमाल तापमान 42 ते 44 अंशांवर जात आहे. या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे यात्रा काळात बहुतांशी ठिकाणी शांतता पाहावयास मिळत आहे. शेतीकाम करतानाही सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत केले जात आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक ठिकाणी आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे. या दरम्यान सर्वांनी आपल्यासह घरातील वयस्कर मंडळी व लहान बालकांची काळजी घेण्याची गरज आहे.