...तर आज संपूर्ण भारत बर्फाखाली असता!

आंध्र प्रदेशातील डोंगररांगांनी उलगडले मोठे रहस्य

    दिनांक :19-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
hole of India would be under snow पृथ्वीच्या निर्मितीपासून आजपर्यंत अनेक भौगोलिक बदल घडले आहेत. आज ज्या खंडांना आपण स्वतंत्र भूभाग म्हणून पाहतो, ते एकेकाळी एकमेकांशी जोडलेले होते, हे वैज्ञानिक संशोधनातून वारंवार समोर आले आहे. आता अशाच एका नव्या संशोधनातून भारत आणि अंटार्क्टिका यांच्यातील कोट्यवधी वर्षांपूर्वीचे संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संशोधकांच्या मते, सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी भारत आणि अंटार्क्टिका हे एका विशाल भूखंडाचा भाग होते. त्या काळात दोन्ही भागांदरम्यान प्रचंड पर्वतरांगा अस्तित्वात होत्या. पृथ्वीच्या टेक्टॉनिक प्लेट्समध्ये झालेल्या बदलांमुळे हे भूभाग वेगळे झाले आणि लाखो-कोट्यवधी वर्षांच्या प्रवासानंतर हजारो किलोमीटर दूर गेले.
 
 

India under snow
 
जिरकॉन खनिजामुळे झाला उलगडा
अलीकडे आंध्र प्रदेशातील काही डोंगररांगांचे अध्ययन करताना संशोधकांना अंटार्क्टिकाच्या पूर्वेकडील पर्वतरांगांशी आश्चर्यकारक साम्य आढळून आले. विशेषतः ग्रेनुलाइट प्रकारच्या खडकांमध्ये आढळलेल्या जिरकॉन खनिजामुळे हे संशोधन अधिक महत्त्वाचे मानले जात आहे. जिरकॉन हे असे खनिज आहे जे प्रचंड उष्णता आणि दाब सहन करूनही आपले मूळ स्वरूप टिकवून ठेवते. त्यामुळे पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ते अत्यंत उपयुक्त मानले जाते.
वैज्ञानिकांच्या मते, भारत आणि अंटार्क्टिका हे ‘गोंडवाना’ नावाच्या प्राचीन महासुपरखंडाचा भाग होते. या भूखंडामध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकेचाही समावेश होता. काळाच्या ओघात पृथ्वीच्या अंतर्गत हालचालींमुळे हे खंड वेगवेगळ्या दिशांना सरकत गेले आणि आजची भौगोलिक रचना तयार झाली. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर हे भूभाग वेगळे झाले नसते तर भारतातील हवामान आज पूर्णपणे वेगळे असू शकले असते. कदाचित भारताचा मोठा भाग बर्फाने आच्छादित असता, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या संशोधनामुळे पृथ्वीच्या भूगर्भीय इतिहासाबाबतचे अनेक नवे पैलू समोर येत असून वैज्ञानिक जगतात याची मोठी चर्चा सुरू आहे.