कर्नाटक,
H5N1 outbreak कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यात एच५एन१ (बर्ड फ्लू) विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, या संसर्गामुळे अंदाजे ४० मोरांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे. जिल्ह्याच्या उपायुक्त सुभा कल्याण यांनी या घटनेला अधिकृत दुजोरा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, वन्य पक्ष्यांच्या, विशेषतः मोरांच्या अचानक मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोगशाळेतील अहवालांमध्ये एच५एन१ विषाणूची उपस्थिती आढळून आल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावित क्षेत्राच्या १० किलोमीटर परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या भागात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, सतत देखरेख ठेवण्यासाठी जलद प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत.उपायुक्त सुभा कल्याण यांनी नागरिकांना घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी विशेषतः मांसाहार करणाऱ्यांना फक्त पूर्णपणे शिजवलेले व उकडलेले मांसच सेवन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रशासनाने परिसरातील सुमारे ३१ पोल्ट्री दुकाने आणि १० फार्मची ओळख पटवली असून, त्यांची तपासणी आणि देखरेख सुरू आहे. अलीकडे मृत अवस्थेत आढळलेल्या इतर पक्ष्यांचे नमुनेही पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी H5N1 outbreak मार्च महिन्यात छत्तीसगडमधील बिलासपूर येथेही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची घटना घडली होती. त्या वेळी संबंधित परिसरातील १० किलोमीटरच्या क्षेत्रात पोल्ट्री उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती आणि एका फार्ममध्ये सुमारे ५,५०० कोंबड्यांचा मृत्यू झाला होता.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, एव्हियन इन्फ्लुएंझा ए (एच५एन१) हा विषाणू प्रामुख्याने पक्ष्यांना संक्रमित करतो, मात्र क्वचित प्रसंगी तो मानवांमध्येही पसरू शकतो. १९९६ साली प्रथम ओळखला गेलेला हा विषाणू २०२० पासून विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. मानवांमध्ये संसर्ग झाल्यास आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि मृत्यूदरही तुलनेने जास्त असल्याने आरोग्य यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.
तुमकूरमधील H5N1 outbreak सद्यस्थिती लक्षात घेता, प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असून, नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.