राजकारणात 'खळबळ' संजय शिरसाट यांचे विधान चर्चेत

    दिनांक :02-May-2026
Total Views |
मुंबई
Sanjay Shirsat महाराष्ट्राच्या राजकारणात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच युतीच्या भवितव्याबाबत चर्चांना उधाण आले असून, महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गट भविष्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतात, असे संकेत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
 

Sanjay Shirsat  
संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने २०२९ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढू शकतात, यात कोणताही गैर नाही. त्यांच्या मते, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षांनी स्वतःची ताकद वाढवणे आणि संघटना मजबूत करणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. या विधानामुळे महायुतीतील भविष्यातील समीकरणांबाबत तर्कवितर्कांना चालना मिळाली आहे. दरम्यान, यापूर्वीही महायुतीतील जागावाटप, स्वतंत्र लढण्याची शक्यता आणि पक्षांच्या अंतर्गत रणनीती यावर विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. शिंदे गट आणि भाजप यांच्यातील समन्वयाबाबत वेळोवेळी Sanjay Shirsat  वेगवेगळी विधाने समोर येत असून, त्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केले जात आहे. शिरसाट यांच्या वक्तव्यावरून महायुतीत मतभेद वाढत असल्याची चर्चा रंगली असली, तरी सध्या तरी अधिकृतपणे युती तोडण्याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपल्या स्वतंत्र रणनीतीची चाचपणी करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.राजकीय वर्तुळात या घडामोडींमुळे २०२९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात नव्या समीकरणांची शक्यता अधिक गडद झाल्याचे मानले जात आहे.