नवी दिल्ली,
middle berth will open only at night भारतीय रेल्वेत प्रवास करताना मिडल बर्थवरून होणारे वाद आता कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट नियम जारी केले आहेत. विशेषतः लोअर आणि मिडल बर्थ वापरणाऱ्या प्रवाशांमध्ये वारंवार निर्माण होणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने हे नियम काटेकोरपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.नव्या सूचनांनुसार, आरक्षित डब्यांमधील मिडल बर्थ फक्त रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंतच उघडता येणार आहे. त्यानंतर सकाळी ती पुन्हा फोल्ड करून बंद ठेवणे आवश्यक राहणार आहे. दिवसभर मिडल बर्थ उघडी ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे, जेणेकरून लोअर बर्थवरील प्रवाशांना आरामात बसता येईल.
कठोरपणे अंमलबजावणी होणार
रेल्वे प्रशासनाच्या मते, अनेकदा लांब पल्ल्याच्या प्रवासात मिडल बर्थ दिवसभर उघडी ठेवल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर प्रवाशांना बसण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. यावरून सहप्रवाशांमध्ये वाद निर्माण होत असल्याच्या तक्रारी सातत्याने रेल्वेकडे येत होत्या.रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे नियम यापूर्वीही अस्तित्वात होते, मात्र आता त्यांची अंमलबजावणी अधिक कठोरपणे केली जाणार आहे. नियमांचे पालन करण्याची जबाबदारी टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली असून गरज पडल्यास नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
रेल्वेने विविध बर्थसंदर्भात स्वतंत्र नियम स्पष्ट केले आहेत. लोअर बर्थ दिवसा सहप्रवाशांसोबत शेअर करावी लागेल, तर अपर बर्थचा वापर प्रवासी कोणत्याही वेळी आरामासाठी करू शकतो. साइड लोअर आणि साइड अपर बर्थबाबतही स्वतंत्र नियम लागू करण्यात आले आहेत.रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे प्रवास अधिक शिस्तबद्ध आणि आरामदायी होईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना याचा मोठा फायदा होणार असून प्रवाशांमधील अनावश्यक वाद कमी होण्यास मदत मिळेल.दरम्यान, रेल्वेने सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सहप्रवाशांचा विचार करून प्रवास केल्यास रेल्वे प्रवास अधिक सुखकर होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.