मुंबई
Devendra Fadnavis राज्यात पेट्रोल-डिझेलच्या संभाव्य तुटवड्याबाबत पसरत असलेल्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत स्पष्ट भूमिका मांडली. जागतिक परिस्थिती अनिश्चित असतानाही राज्यातील इंधन पुरवठा साखळी मजबूत असल्याचे त्यांनी सांगितले असून नागरिकांनी घाबरून इंधन खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारकडे पेट्रोल-डिझेलचा पुरेसा रणनीतिक साठा उपलब्ध आहे आणि राज्यातही पुरवठा नियमितपणे सुरू आहे. मात्र, अफवा आणि भीतीमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक पॅनिक निर्माण होत असल्याने काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले.फडणवीस यांनी स्पष्ट केले की इंधन वितरणाची संपूर्ण साखळी वर्षानुवर्षांच्या मागणी आणि वापराच्या आकडेवारीवर आधारित असते. एखाद्या पेट्रोल पंपावर किंवा तालुक्यात दररोज व मासिक सरासरी किती इंधन लागते, याचा अभ्यास करूनच पुरवठा नियोजन केले जाते. मात्र, अचानक मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यास ही साखळी विस्कळीत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
उदाहरण देताना त्यांनी बँकिंग Devendra Fadnavis व्यवस्थेचा उल्लेख करत सांगितले की, जसे सर्व ग्राहकांनी एकाच वेळी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर बँकिंग प्रणाली तात्पुरती अडचणीत येते, तसेच पॅनिक बायिंगमुळे इंधन पुरवठा व्यवस्थेवर ताण येतो. याचा अर्थ साठा कमी आहे असा नसून मागणीतील अचानक वाढीमुळे वितरणावर परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.