मुंबई
Pratap Sarnaik राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर इशारा दिला आहे. “मराठीचे व्यावहारिक ज्ञान नसेल, तर महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले. रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्र कॉनक्लेव्ह’ कार्यक्रमात बोलताना सरनाईक यांनी राज्य सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये बसलेल्या प्रवाशाशी चालकाला मराठीत संवाद साधता आला पाहिजे. किमान प्रवाशाची भाषा चालकाला आणि चालकाची भाषा प्रवाशाला समजली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. रिक्षा आणि टॅक्सी परवान्याच्या अटींमध्येही मराठी भाषेच्या ज्ञानाचा नियम पूर्वीपासूनच असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी सक्तीच्या मुद्द्यावर Pratap Sarnaik परिवहन विभागाने सायबर पोलिसांना अॅपवर बंदी घालण्यासंदर्भात पाठवलेल्या पत्रामुळे निर्माण झालेल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केले. संबंधित पत्र मागे घेऊन सुधारित पत्र सायबर पोलिसांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात ओला आणि उबेरसारख्या अॅप-आधारित टॅक्सी सेवांमधील चालकांनाही मराठी सक्तीचा नियम लागू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमादरम्यान त्यांनी मराठी शिकण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहितीही दिली. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुस्तिका देण्यात आल्या असून, विविध साहित्य संस्थाही पुढाकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्था चालकांना मराठी शिकवण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.देशातील विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर लोक रोजगारासाठी मुंबई आणि महाराष्ट्रात येत असल्याचे सांगताना, केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारमधूनच नव्हे तर संपूर्ण देशातून नागरिक येथे येतात, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले. मात्र महाराष्ट्रात काम करताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.