नवी दिल्ली,
RCB Tops the Points Table इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) ने तब्बल १५ वर्षांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावत मोठा पराक्रम केला आहे. संघाने १८ गुण आणि +०.७८३ नेट रन रेटसह हे स्थान मिळवले असून या कामगिरीमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आरसीबीने गेल्या वर्षी आयपीएलचे पहिले विजेतेपद जिंकले असले तरी त्या हंगामात संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिला होता. मात्र यंदा संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत अव्वल स्थानावर आपली पकड मजबूत केली आहे.
आरसीबी याआधी फक्त दोन वेळा गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला आहे. २००९ मध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, परंतु डेक्कन चार्जर्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०११ मध्ये डॅनियल व्हेटोरीच्या नेतृत्वाखाली संघाने पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले होते, मात्र अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला होता.यंदा १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीने पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत इतिहासात आपले नाव कोरले आहे. २०१६ आणि २०२५ मध्ये संघ दुसऱ्या स्थानी राहिला होता. २०२५ मध्ये संघाने अखेर आयपीएल ट्रॉफी जिंकून १८ वर्षांचा दुष्काळ संपवला होता.
दरम्यान, या हंगामात विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी करत १४ सामन्यांत ५५७ धावा केल्या असून तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. मात्र ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो आठव्या स्थानावर आहे. त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने १४ सामन्यांत २४ बळी घेत पर्पल कॅप मिळवली आहे. त्याचबरोबर गुजरातचा गोलंदाज कागिसो रबाडानेही २४ बळी घेतले आहेत, मात्र चांगल्या इकॉनॉमी रेटमुळे (७.७१) पर्पल कॅप भुवनेश्वर कुमारकडे आहे.