नवतपा पूर्वीच गोंदियात सुर्यदेवाचे ‘लॉकडाऊन’!

    दिनांक :24-May-2026
Total Views |
- जिल्ह्यात सातत्याने तापमान वाढ : रस्ते निर्मणूष्य

गोंदिया, 
विदर्भासह जिल्ह्यात Scorching Heat उष्णतेची लाट सुरू आहे. दिवसेंदिवस रेकॉर्ड तापमानाची नोंद होत असताना तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी 21 मे रोजी जिल्ह्यात रेकॉर्ड 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यात गेली दोन दिवस 44.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. तर आजही उन्हाचा पारा चांगलाच तापला असून रविवारी जिल्ह्यात पुन्हा 45 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवतपापूर्वीच जिल्ह्यात सुर्यदेवाने ‘लॉकडाऊन’ लावल्याचे चित्र आहे.
 
 
heat
 
Scorching Heat  गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यावर सुर्याचे आग ओकणे सुरू असल्याने भीषण उष्णता निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिक घराबाहेर निघणे टाळत आहेत. त्यामुळे सकाळी 9 वाजतापासूनच रस्ते निर्मनुष्य होत आहेत. परिणामी रस्त्यासह गल्लीबोळात सुकसुकाट दिसून येत असून तर उष्णतेपुढे घरातील पंखे, कुलर आदी उपकरणांनीही नांगी टाकल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वाढत्या तापमानाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत आहे. सोमवारी 25 मेपासून नवतपाला सुरुवात होत आहे. अशात सुर्यदेवाचे आग ओकणे सुरू असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत.
 
उष्माघाताने एकाचा बळी....
जिल्ह्यात 21 मे रोजी सर्वाधिक 45.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली असताना त्याच दिवशी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील विनोद विश्वनाथ राऊत (38) या शेतमजुराचा शेतात काम करत असताना अस्वस्थ वाटून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. वैद्यकीय अहवालात त्याचे मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असले तरी त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमीक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला होता.

हवामान खात्याच्या अंदाजात बदल
दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असतानाच हवामान खात्याकडून जिल्ह्यात 27 मे पर्यंत येलो अर्लट जाहीर करण्यात आला होता. त्यात आजच्या, नवीन अहवालानुसार सोमवार 25 मेपर्यंत जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आले आहे. यात उद्या पुन्हा बदल होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.