मुंबई
heat wave राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत असून, कुठे तीव्र उष्णता तर कुठे पावसाची शक्यता अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः विदर्भात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र झाला असून भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी गंभीर इशारे जारी केले आहेत.
वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या भागांमध्ये तापमानाने 43 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याची नोंद झाली असून, काही ठिकाणी तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अमरावती जिल्ह्यात सलग काही दिवसांपासून प्रचंड उष्णता कायम असून आरोग्यावरही परिणाम दिसू लागले आहेत.दरम्यान, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस विदर्भात उष्णता अधिक वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून दुपारच्या वेळेत, विशेषतः 12 ते 4 या कालावधीत घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्णघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
राज्याच्या इतर भागांमध्येही heat wave हवामानात विविध बदल दिसत आहेत. बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत काल पावसाची नोंदही झाली आहे.मुंबई आणि किनारपट्टी भागात मात्र दमट आणि उकाड्याचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये आज अंशतः ढगाळ हवामान राहील. कमाल तापमान सुमारे 34 ते 35 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असली तरी हवेतील उच्च आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवणार आहे. संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी त्यातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीवर आर्द्रतेत वाढ होत असून, नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. एकूणच राज्यात पुढील काही दिवस हवामानाचा अस्थिर आणि तीव्र स्वरूपाचा अनुभव कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.