धार ,
Ritualistic Worship at Bhojshala भोजशाळा-कमल मौला संकुलाला मंदिर म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव यांनी प्रथमच धार येथे विधीवत पूजा केली. या कार्यक्रमानंतर त्यांनी परिसराच्या विकासासाठी आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी मोठ्या घोषणा केल्या. तसेच भोजशाळा आंदोलनात प्राण गमावलेल्या तीन व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी पंत सिंग, अंतर सिंग आणि लक्ष्मण सिंग या आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या स्मरणार्थ एक मिनिट मौन पाळण्यात आले. या निर्णयाला त्यांनी या संघर्षाचे फलित असल्याचे सांगत हुतात्म्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

धारला ज्ञान, संस्कृती आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र बनवण्याचा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी “मा सरस्वती लोक” आणि “राजा भोज संशोधन केंद्र” या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा केली. उज्जैनच्या महाकाल लोकच्या धर्तीवर ज्ञानदेवतेला समर्पित भव्य आध्यात्मिक मार्गिका उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजा भोज यांच्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या स्थापत्य, साहित्यिक आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठे शिवलिंग आणि भोपाळ तलावासारख्या रचनांमुळे त्यांचा वारसा आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धारच्या विकासासाठी ८८ कोटी रुपयांच्या १२ प्रकल्पांची पायाभरणीही यावेळी करण्यात आली. शहराला आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र बनवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या १५ मे रोजीच्या निर्णयाचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, या निर्णयामुळे “सत्य आणि असत्य” यातील फरक स्पष्ट झाला आहे. न्यायालयाने २००३ मधील ASI चा आदेश रद्द केल्याचा संदर्भही त्यांनी दिला. या निर्णयानंतर परिसराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक स्वरूपावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.